

नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रासमोर उभ्या ठाकलेल्या नव्या सायबर धोक्यांमुळे सहकारी बँकांनी आपल्या सुरक्षे साठी आयटी (IT) यंत्रणांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः ‘मायथोस’सारख्या अत्याधुनिक सायबर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बँकांच्या सुरक्षा व्यवस्थेचा पुनर्विचार करण्यात येत आहे.
तज्ञांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्ता - AI वर आधारित सायबर हल्ल्यांमुळे बँकिंग प्रणालींना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि व्यवहारांची विश्वासार्हता टिकवण्यासाठी बँकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे.
दरम्यान, अर्थमंत्र्यांनीही बँकिंग प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांचा डेटा आणि आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवणे ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बँकिंग दिग्गजांचा ‘ॲक्शन प्लॅन’
पंजाब अँड सिंध बँकेने या नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आयटी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचे संकेत दिले आहेत. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक स्वरूप कुमार साहा यांनी सांगितले की, सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
युको बँकेनेही गेल्या आर्थिक वर्षात आयटी खर्चात मोठी वाढ केली असून त्यातील मोठा हिस्सा सायबर सुरक्षेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी कुमार यांनी याबाबत माहिती दिली.
तज्ज्ञांचे मत आहे की, भविष्यात सायबर हल्ल्यांचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे होणार असून बँकांनी तंत्रज्ञान, कर्मचारी प्रशिक्षण आणि डेटा संरक्षण यावर एकत्रित लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
एकूणच, वाढत्या डिजिटल व्यवहारांच्या युगात ग्राहकांचा विश्वास टिकवण्यासाठी आणि सायबर धोक्यांना रोखण्यासाठी सरकारी बँका आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत.