कर्जमाफीचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक; रिझर्व्ह बँकेचा 'बनावट' संस्थांवर प्रहार 
Arth Warta

तुम्हालाही कर्जमाफीचा फोन आलाय? थांबा... आधी ही बातमी वाचा!

बनावट प्रमाणपत्रे आणि 'सर्व्हिस चार्ज'चा सापळा; रिझर्व्ह बँकेने उघड केला कर्जमाफीच्या जाहिरातींमागचा खरा चेहरा.

Prachi Tadakhe

मुंबई: तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी कर्ज घेतले असेल आणि तुम्हाला 'कर्जमाफी' मिळवून देण्याचे फोन किंवा मेसेज येत असतील, तर वेळीच सावध व्हा. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कर्जमाफीचे खोटे आश्वासन देणाऱ्या अनधिकृत आणि दिशाभूल करणाऱ्या मोहिमांविरुद्ध जनतेला कडक इशारा दिला आहे. अशा फसव्या योजनांपासून दूर राहण्याचे आवाहन मध्यवर्ती बँकेने केले आहे.

नेमका प्रकार काय आहे?

रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आले आहे की, काही व्यक्ती आणि संस्था, बँका तसेच NBFC कडून (बँकिंगेतर वित्तीय संस्था) घेतलेले कर्ज माफ करून देण्याचे खोटे दावे करत आहेत. या संस्था विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जाहिराती आणि थेट संपर्काद्वारे कर्जदारांना आकर्षित करत आहेत.

फसवणुकीची पद्धत:

  • कर्जदारांना कर्जमाफीची खोटी आश्वासने दिली जातात.

  • बनावट “कर्जमाफी प्रमाणपत्रे” जारी केली जातात.

  • सेवा शुल्क (Service Fee) किंवा कायदेशीर शुल्काच्या नावाखाली कर्जदारांकडून मोठी रक्कम उकळली जाते.

डिसेंबर २०२३ च्या इशाऱ्याचा पुनरुच्चार

रिझर्व्ह बँकेने डिसेंबर २०२३ मध्ये देखील अशाच प्रकारचा सल्ला (Advisory) जारी केला होता. मात्र, अद्यापही अशा कारवाया थांबलेल्या नसल्यामुळे बँकेने पुन्हा एकदा जनतेला सतर्क केले आहे. मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले आहे की, अशा व्यक्ती अथवा संस्थांकडे कर्ज माफ करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही.

"असे दावे पूर्णपणे खोटे असून, या संस्थांवर लागू कायद्यांनुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. अशा कारवायांमुळे केवळ कर्जदारांचीच फसवणूक होत नाही, तर देशाच्या आर्थिक स्थैर्यालाही धोका निर्माण होतो." - भारतीय रिझर्व्ह बँक

अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम

रिझर्व्ह बँकेने नमूद केले की, अशा दिशाभूल करणाऱ्या मोहिमांमुळे:

  1. देशाच्या पतपुरवठा प्रणालीच्या (Credit System) सुव्यवस्थित कामकाजात अडथळा येतो.

  2. प्रामाणिक ठेवीदारांच्या हिताला बाधा पोहोचते.

  3. बँकिंग क्षेत्रातील शिस्त बिघडून आर्थिक स्थैर्य धोक्यात येते.

नागरिकांनी काय करावे?

  • थेट संपर्क साधा: कर्जाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास किंवा परतफेडीत अडचण येत असल्यास, त्रयस्थ व्यक्तीकडे न जाता थेट आपल्या संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेशी संपर्क साधावा.

  • अमिषाला बळी पडू नका: कोणत्याही अनधिकृत संस्थेला 'सेवा शुल्क' म्हणून पैसे देऊ नका.

  • तक्रार नोंदवा: अशा फसव्या मोहिमांची किंवा संशयास्पद व्यक्तींची माहिती तात्काळ पोलीस किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांकडे द्यावी.

कर्जमाफीच्या नावाखाली पैसे उकळणे हा एक मोठा आर्थिक गुन्हा आहे. आपले कष्टाचे पैसे वाचवण्यासाठी आणि कायदेशीर कचाट्यातून वाचण्यासाठी केवळ अधिकृत बँकिंग मार्गांचाच वापर करा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT