मुंबई: डिजिटल व्यवहारांच्या युगात आजही मोठ्या रकमेच्या देयकांसाठी चेकचा (Check) वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, याच चेकचा वापर करून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. चेकवरील नाव बदलणे, रकमेत फेरफार करणे किंवा बनावट स्वाक्षरी करणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’ (Positive Pay System - PPS) लागू केली आहे. ५० हजार रुपयांहून अधिक रकमेच्या चेकसाठी हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे.
‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’ हा चेकद्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठीचा एक अतिरिक्त सुरक्षा स्तर आहे. यामध्ये चेक जारी करणारी व्यक्ती चेकची माहिती (उदा. चेक क्रमांक, तारीख, रक्कम आणि लाभार्थ्याचे नाव) बँकेला आधीच कळवते. जेव्हा तो चेक वटवण्यासाठी बँकेत येतो, तेव्हा बँक ग्राहकाने आधी दिलेल्या माहितीशी त्याची पडताळणी करते. माहिती तंतोतंत जुळली तरच पेमेंट मंजूर केले जाते.
५०,००० रुपयांची मर्यादा: ५०,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांना ही प्रणाली वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.
५ लाखांवर अनिवार्य: अनेक प्रमुख बँकांनी ५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी 'पॉझिटिव्ह पे' अनिवार्य केले आहे.
चेक लिहून दिल्यानंतर ग्राहकाने खालील माहिती बँकेला कळवणे आवश्यक आहे:
खाते क्रमांक
चेक क्रमांक
चेकची तारीख
चेकवरील रक्कम
पैसे स्वीकारणाऱ्याचे (Payee) नाव
ही माहिती तुम्ही बँकेच्या मोबाईल ॲप, नेट बँकिंग किंवा SMS द्वारे घरी बसून सहज देऊ शकता.
चेकमध्ये फेरफार करून होणारी फसवणूक टाळण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत प्रभावी आहे. जर माहितीमध्ये थोडीही तफावत आढळली, तर बँक तो चेक त्वरित संशयास्पद म्हणून चिन्हांकित करते आणि पेमेंट थांबवते. यामुळे खातेदाराचे लाखो रुपये सुरक्षित राहण्यास मदत होते.