राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! 
Arth Warta

पगार हवाय? मग आधी ई-केवायसी करा!

दोनदा पगार उचलण्याचे प्रकार रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; कोल्हापुरातील २० हजार कर्मचाऱ्यांनाही फटका बसणार

Prachi Tadakhe

कोल्हापूर: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केल्याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या खात्यात जमा होणार नाही. काही कर्मचाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी करून दोनदा पगार उचलल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत.

१८ लाख कर्मचाऱ्यांवर परिणाम

या नवीन निर्णयाचा परिणाम राज्यातील सुमारे १८ लाख कर्मचाऱ्यांवर होणार आहे. केवळ कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला, तर येथे २० हजारांहून अधिक सरकारी कर्मचारी आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण नसेल तर, त्यांचे वेतन रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

'सेवार्थ' प्रणालीत होणार बदल

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची सर्व माहिती 'सेवार्थ' प्रणालीमध्ये असते. आता या प्रणालीत तांत्रिक बदल केले जात आहेत. नवीन नियमानुसार, कर्मचाऱ्यांना त्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. आधारशी संलग्न नसलेले बँक खाते आता स्वीकारले जाणार नाही. यामुळे संपूर्ण पगार प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे.

ई-केवायसीसाठी काय करावे लागेल?

१. आधार पडताळणी: आपले आधार कार्ड वैध असल्याची खात्री करणे.

२. मोबाईल ओटीपी: आधारला जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओटीपीद्वारे खात्री करणे.

३. माहिती अपडेट: आपली वैयक्तिक माहिती अर्जात अद्ययावत करणे.

४. बँक खाते लिंक: पगार जमा होणारे बँक खाते आधारला जोडलेले आहे की नाही, याची तपासणी करणे.

भविष्यात पगाराच्या बाबतीत कोणतेही तांत्रिक गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

SCROLL FOR NEXT