PF चे नियम बदलले! एका क्लिकवर ७५% रक्कम खात्यात! 
Arth Warta

पीएफ खातेधारकांनो खुशखबर! कारण न देता काढा ७५% रक्कम!

७५% रक्कम काढण्यासाठी 'कारण' देण्याची गरज नाही; जाणून घ्या नवीन नियम. 'EPFO 2.0' प्रणाली लागू; आता थेट UPI द्वारेही पैसे मिळणार!

Prachi Tadakhe

नवी दिल्ली: देशातील कोट्यवधी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खातेधारकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना कोणतेही ठोस कारण देण्याची गरज भासणार नाही. केंद्र सरकारने 'ईपीएफओ २' (EPFO 2.0) ही नवीन डिजिटल प्रणाली कार्यान्वित केली असून, याद्वारे कर्मचारी आपल्या खात्यातील एकूण ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम कोणत्याही अटीशिवाय काढू शकणार आहेत.

काय आहे नवीन 'ईपीएफओ २' प्रणाली?

आतापर्यंत पीएफमधील रक्कम काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना विविध कागदपत्रे आणि ठोस कारणे द्यावी लागत असत. अनेकदा फाईल्स वेगवेगळ्या कार्यालयांत फिरत असल्याने पैसे मिळण्यास विलंब होत असे. मात्र, 'ईपीएफओ २' या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे ही संपूर्ण प्रक्रिया आता एकाच ठिकाणी एकत्रित करण्यात आली आहे. यामुळे क्लेम मंजुरीची प्रक्रिया अत्यंत वेगवान होणार असून, कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील हेलपाटा वाचणार आहे.

या नवीन नियमांतर्गत, कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यात जमा असलेल्या एकूण रकमेपैकी (कर्मचारी आणि कंपनीचे योगदान व त्यावरील व्याज मिळून) ७५ टक्के रक्कम काढू शकणार आहेत. आणीबाणीच्या काळात किंवा तातडीच्या आर्थिक गरजेच्या वेळी कर्मचाऱ्यांना विनासायास पैसे उपलब्ध व्हावेत, हा यामागचा सरकारचा मुख्य उद्देश आहे.

लवकरच यूपीआय (UPI) द्वारे मिळणार पैसे

या प्रणालीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सरकार लवकरच पीएफची रक्कम यूपीआयद्वारे मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

  • ही सुविधा प्रणाली लागू झाल्याच्या साधारण ७ ते १० दिवसांत सुरू होईल.

  • कर्मचाऱ्यांना आपल्या ईपीएफओ पोर्टलवर जाऊन बँक खात्याशी 'यूपीआय आयडी' लिंक करावा लागेल.

  • त्यानंतर पीएफचे पैसे थेट खात्यात जमा करणे अधिक सोपे होणार आहे.

कर्मचाऱ्यांना होणारे मुख्य फायदे:

१. सुलभ प्रक्रिया: पीएफ काढण्यासाठी कोणतीही जटील कारणे देण्याची गरज उरणार नाही.

२. वेळेची बचत: डिजिटल प्रक्रियेमुळे क्लेम लवकर मंजूर होतील.

३. कार्यालयांत फेऱ्यांची गरज नाही: ऑनलाईन सुविधेमुळे घरबसल्या काम होणार आहे.

४. आर्थिक स्वातंत्र्य: आणीबाणीच्या प्रसंगी स्वतःच्याच कष्टाच्या पैशांवर तात्काळ हक्क मिळणार आहे.

केंद्र सरकारचा हा निर्णय नोकरदार वर्गासाठी अत्यंत सकारात्मक असून, यामुळे पीएफशी संबंधित कामे आता अधिक पारदर्शक आणि गतिमान होणार आहेत.

SCROLL FOR NEXT