मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात करत तो ५.२५ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. पतधोरण समितीच्या (MPC) तीन दिवसांच्या बैठकीनंतर घेतलेल्या या निर्णयाचा फायदा जरी गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर फ्लोटिंग रेट कर्जदारांना होणार असला, तरी याच निर्णयाचा फटका मुदत ठेवी (Fixed Deposits – FD) धारकांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात करत तो ५.२५ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. पतधोरण समितीच्या (MPC) तीन दिवसांच्या बैठकीनंतर घेतलेल्या या निर्णयाचा फायदा जरी गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर फ्लोटिंग रेट कर्जदारांना होणार असला, तरी याच निर्णयाचा फटका मुदत ठेवी (Fixed Deposits – FD) धारकांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकीकडे कर्जदारांना दिलासा मिळत असताना दुसरीकडे मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केलेल्या ग्राहकांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरू शकते. बऱ्याच बँकांनी ऑक्टोबरपर्यंतच त्यांच्या FD व्याजदरांमध्ये कपात केली होती. आता रेपो दरात झालेल्या नवीन कपातीनंतर बँका तसेच लघु वित्त बँका (Small Finance Banks) पुन्हा एकदा मुदत ठेवींवरील व्याजदर कमी करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोल्डन ग्रोथ फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुर जालान यांनी याबाबत बोलताना सांगितले की,
“ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून, रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात केल्यामुळे मुदत ठेवींसह इतर व्याजदर असलेल्या बचत योजनांवरील परतावा पुढील काळात घटण्याची भीती निर्माण होईल.”
ते पुढे म्हणाले की, येत्या काही महिन्यांत बँका FD व्याजदर कमी करतील, ज्यामुळे ठेवीदारांना अपेक्षित आणि सुरक्षित परतावा मिळवणे अधिक कठीण होईल. कमी व्याजदरांमुळे गुंतवणूक करणारे श्रीमंत गुंतवणूकदार सुद्धा मुदत ठेवींऐवजी इतर गुंतवणूक पर्यायांचा शोध घेण्याचा विचार करतील.
रेपो दर कपातीनंतर बँकांचा निधी उभारणीचा खर्च सामान्यतः कमी होतो. त्यामुळे त्या FD वरील व्याजदरात कपात करतात. मात्र, ही कपात नेहमीच RBI ने केलेल्या कपातीइतकीच असेल असे नाही. म्हणजेच, रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात झाली म्हणून बँका FD व्याजदरही तितक्याच प्रमाणात कमी करतीलच, असे ठामपणे सांगता येत नाही.
सध्याच्या परिस्थितीत FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांनी विद्यमान व्याजदर, कालावधी आणि करपश्चात (post-tax) परतावा याचा सखोल विचार करूनच निर्णय घ्यावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी जोखीम समजून घेऊन इतर पर्यायांचाही अभ्यास करावा, असा सल्ला दिला जात आहे.