पुणे : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६” लागू होणार असून त्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी परिपत्रक जारी केले आहे.
या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेरगठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर करण्यात आलेल्या थकीत कर्जधारक शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. ३० सप्टेंबर २०२४ रोजी थकीत असलेली व ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली कर्जे या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत.
योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना कमाल २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. तसेच ज्यांची थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांसाठी “एकवेळ समझोता योजना (OTS)” राबविण्यात येणार असून ठरावीक रक्कम भरल्यानंतर उर्वरित २ लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे.
याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ योजना देखील जाहीर करण्यात आली आहे. सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षांमध्ये वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून सहकारी बँका व पतसंस्थांनाही थकीत कर्ज वसुलीत मदत होणार असल्याचे मानले जात आहे.