

सहकार क्षेत्रात पारदर्शक कारभार, आर्थिक शिस्त आणि सभासदाभिमुख सेवेमुळे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समता नागरी सहकारी पतसंस्था, निरा यांना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने प्रतिष्ठेचा दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला. भोर येथील निसर्गरम्य परिसरात वसलेल्या आर्यन रिव्हरवूड रिसॉर्ट येथे हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील मान्यवर, विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत समता पतसंस्थेला हा राज्यस्तरीय सन्मान बहाल करण्यात आला.
या सोहळ्यात उदय जोशी तसेच राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते संस्थेचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक करत समता पतसंस्था सहकार क्षेत्रासाठी आदर्श ठरत असल्याचे नमूद केले. संस्थेचे मुख्य व्यवस्थापक युवराज फरांदे, व्यवस्थापक राहुल ढोले, वरिष्ठ अधिकारी विक्रम जमदाडे, गणेश चव्हाण आणि किरण रासकर यांनी संस्थेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फेडरेशनच्या सीईओ सुरेखा लवांडे यांनी केले.
समता पतसंस्थेची आर्थिक प्रगती भक्कम आणि स्थिर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. संस्थेने अल्पावधीत विश्वासार्हतेची उंची गाठली आहे.
आर्थिक ठळक बाबी :
एकूण ठेवी : २७६ कोटी रुपये
कर्जवाटप : १९६ कोटी रुपये
संस्थेचा स्वतःचा निधी : ४८ कोटी रुपये
सीआरएआर : २२ टक्के
एनपीए : ० टक्के
शून्य टक्के एनपीए ही बाब संस्थेच्या काटेकोर कर्जधोरणाची आणि प्रभावी वसुली व्यवस्थेची साक्ष देणारी असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
संस्थेचे अध्यक्ष दिलीप फरांदे आणि उपाध्यक्ष उत्तम आगवणे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली संस्था सातत्याने प्रगती करत आहे. संचालक मंडळाचे दूरदृष्टीपूर्ण नियोजन, आर्थिक शिस्त, आधुनिक व्यवस्थापन पद्धती आणि कर्मचाऱ्यांची ग्राहकाभिमुख सेवा यामुळे संस्थेने विश्वासार्हतेचा नवा मापदंड निर्माण केला आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील सभासदांना सुलभ आर्थिक सेवा, पारदर्शक व्यवहार आणि जलद कर्जपुरवठा यामुळे संस्थेवर सभासदांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. लघुउद्योजक, शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक बळ देण्याचे कार्य संस्था प्रभावीपणे पार पाडत आहे.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी समता पतसंस्थेचा प्रवास हा सहकार चळवळीच्या मूलभूत तत्त्वांना अनुसरून असल्याचे सांगितले. योग्य नियोजन, जबाबदार प्रशासन आणि प्रामाणिक कार्यपद्धती यांच्या जोरावर संस्था भविष्यात आणखी मोठी भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दीपस्तंभ पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्याला राज्यस्तरावर नवी ओळख मिळाली असून हा सन्मान संचालक, कर्मचारी आणि सभासदांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.