

इचलकरंजी: येथील दि व्यंकटेश्वरा सहकारी बँकेने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात नेत्रदीपक प्रगती केली आहे. बँकेने आपल्या व्यवसायाचा १५१ कोटींचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला असून, १ कोटी ८० लाख रुपयांचा ढोबळ नफा संपादन केला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन श्रीकांत मंत्री यांनी दिली.
बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत सर्वच क्षेत्रांत वाढ दिसून आली आहे:
एकूण व्यवसाय: १३७.८४ कोटींवरून वाढून १५१.१० कोटींवर पोहोचला आहे.
निव्वळ नफा: बँकेने ९३.५७ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे.
शून्य टक्के एनपीए: प्रभावी कर्ज व्यवस्थापन आणि वेळेवर होणाऱ्या वसुलीमुळे बँकेने आपला निव्वळ एनपीए ०% राखण्यात यश मिळवले आहे, जे बँकेच्या आर्थिक सक्षमतेचे प्रतीक आहे.
ठेवी व कर्ज: बँकेच्या ठेवी ९४.११ कोटींवर तर कर्जपुरवठा ५६.९९ कोटींवर पोहोचला आहे.
व्हा. चेअरमन इंदरचंद लोया यांनी बँकेच्या आगामी योजनांबद्दल माहिती देताना सांगितले की, ग्राहकांना जलद सेवा देण्यासाठी बँक लवकरच आपली नवीन शाखा सुरू करणार आहे. तसेच, बदलत्या काळानुसार मोबाईल बँकिंग आणि इतर डिजिटल सुविधांवर अधिक भर दिला जाणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कोईक यांनी बँकेच्या पारदर्शक व्यवहार प्रणालीवर प्रकाश टाकला. सभासदांचा वाढता विश्वास, संचालक मंडळाचे अचूक मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांचे समर्पण यामुळेच बँकेने ही प्रगती साधली असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी चेअरमन पुनमचंद दरगड यांनीही बँकेच्या विश्वासाहर्तेबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक रामकिशोर बांगड, ज्येष्ठ संचालिका सौ. शशिकला बोरा, पन्नालाल बिडला, गिरीराज मोहता, ओमप्रकाश चांडक, संचालिका सौ. निर्मला बालदी, संचालक सीए सत्यनारायण रांदड, नितीन धूत, मनोज सारडा, अॅड. गोपाल सावंत, राजीव खटावकर, विनायक हेरवाडे, संजय आवळे, तज्ञ संचालक सीए सुरेशकुमार लोहिया, मुकेश खाबानी, बँकेचे जनरल मॅनेजर हिराचंद जंगले, शाखाधिकारी दीपक पाटील व सेवकवृंद उपस्थित होते.