

स्वर्गीय डॉ. डी. सी. नरके यांनी स्थापन केलेल्या कुंभी-कासारी सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे प्रतिपादन राज्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
ते कुंभी-कासारी सहकारी बँकेच्या संभाजीनगर येथील सातव्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चंद्रदीप नरके होते.
आबिटकर म्हणाले, “तालुक्यातील अनेक पतसंस्था सध्या अडचणीत आहेत. या पतसंस्थांबाबत योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. सहकार चळवळ टिकवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध आहे.”
आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले की, कुंभी बँकेची वाटचाल यशस्वीपणे सुरू असून बँकेची निवडणूक बिनविरोध पार पडत आहे. जिल्हा बँक आणि कुंभी बँक यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सातत्याने पतपुरवठा होत आहे.
बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, बँकेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असून, याच निमित्ताने सातव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे. बँकेच्या ९० टक्के ठेवी शेतकऱ्यांच्या असून, बँकेचा ऑडिट वर्ग ‘अ’ आहे तसेच एनपीए शून्य टक्के आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात ठेवपावती ठेवणाऱ्या ग्राहकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय बलुगडे, कारखाना उपाध्यक्ष राहुल बलुगडे, उपाध्यक्ष अरुण पाटील, सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. राऊत, शाखा अधिकारी शिवाजी चोगुले, तसेच सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते.