
महाराष्ट्रातील आघाडीची बहु-राज्यीय सहकारी पतपुरवठा संस्था असलेल्या धरमपेठ महिला बहु-राज्यीय सहकारी संस्थेने नुकत्याच झालेल्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहकारी बँक बनण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
सभेत भागधारकांनी सोसायटीचे बँकेत रूपांतर करण्याच्या ठरावाला एकमुखी पाठिंबा दिल्यामुळे हा ठराव मंजूर करण्यात आला, त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कडे बँकिंग परवान्यासाठी लवकरच अर्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोसायटीच्या वतीने सदस्यांसमोर त्यांची वार्षिक कामगिरी आणि रूपांतरणाचा विशेष अजेंडा सादर करण्यात आला. त्याला भागधारकांकडून पूर्ण पाठिंबा देण्यात आला.
नॅशनल फेडरेशनऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज (NAFCUB) ने बँकिंग परवान्यासाठी अर्ज करण्यास पात्र पतसंस्थाची निवड करण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन केला होता. याद्वारे नॅफकबने ४२ सोसायट्यांची निवड करून त्यांना बँकिंग परवान्यासाठी अर्ज करण्यापूर्वी त्यांना बोर्ड आणि एजीएम ठराव पारित करण्याचे निर्देश दिले होते. निवडलेल्या संस्थात धरमपेठ महिला पतपुरवठा संस्थेचा समावेश असून, धरमपेठ महिला पतसंस्था ही या विषयावर भागधारकांची मान्यता मिळवणारी पहिली सोसायटी ठरलेली आहे.
अध्यक्षा निलिमा बावणे यांच्या गतिमान नेतृत्वाखाली, सोसायटी स्थिर वाढीच्या मार्गावर आहे. गेल्या आर्थिक वर्षात तिचा एकूण व्यवसाय २,३०० कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे, तर ८.२५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.
यावेळी, उपाध्यक्षा सत्यक्षी पेंडसे यांनी प्रमुख प्रस्ताव सादर केले, ज्यात भागधारकांसाठी ९.५०% लाभांश जाहीर करण्यात आला आहे. या प्रस्तावांना एकमताने मंजुरी देण्यात आली. संचालकांतर्फे सर्व सदस्यांप्रति संस्थेवरील विश्वास आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून वार्षिक सर्वसाधारण सभेचा समारोप झाला. बैठकीचे संचालन अनघा वैद्य यांनी केले तर आभार प्रदर्शन संगीता राखुवार आणि श्रद्धा पुरोहित यांनी केले.