

देशातील ॲप-आधारित टॅक्सी सेवांमध्ये वाढत्या कमिशन, सर्ज प्राइसिंग आणि अनिश्चित उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सहकार तत्वांवर आधारित एक नवा पर्याय पुढे आणला आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी ‘भारत टॅक्सी’ या सहकारी राइड-हेलिंग प्लॅटफॉर्मची घोषणा करत चालकांना थेट मालकी आणि नफ्यातील वाटा देण्याचे आश्वासन दिले.
दिल्ली-एनसीआर आणि गुजरातमधील कॅब व ऑटो चालकांसोबत झालेल्या टाउन हॉल बैठकीत शहा यांनी सांगितले की, या प्लॅटफॉर्मच्या नफ्यातील ८० टक्के हिस्सा प्रवास केलेल्या किलोमीटरच्या आधारावर चालकांना दिला जाईल, तर उर्वरित २० टक्के हिस्सा सहकारी भांडवल उभारणीसाठी राखून ठेवला जाईल.
“तुमच्या किमान उत्पन्नाचे संरक्षण केले जाईल. त्यापेक्षा जास्त कमाई केल्यास त्याचाही लाभ तुम्हालाच मिळेल,” असे शाह यांनी स्पष्ट केले.
शहा यांनी भारत टॅक्सीची तुलना Amul या सहकारी दुग्ध संस्थेशी केली. त्यांनी सांगितले की, सुमारे ३६ लाख महिलांनी फक्त ५० रुपयांची गुंतवणूक करून अमूलला १.२५ लाख कोटी रुपयांच्या संस्थेत रूपांतरित केले.
“खाजगी कंपन्यांमध्ये नफा मालकांकडे जातो; सहकारी संस्थांमध्ये नफा सदस्यांकडे परत येतो,” असे ते म्हणाले. त्याच धर्तीवर, भारत टॅक्सीमध्ये ५०० रुपयांचा शेअर खरेदी करून चालक सह-मालक बनू शकतात. सदस्यसंख्या वाढल्यावर संचालक मंडळावर चालकांना प्रतिनिधित्वही दिले जाईल.
‘सहकार टॅक्सी / भारत टॅक्सी : स्वावलंबनाचा नवा मार्ग’ या संकल्पनेनुसार ही सेवा केवळ प्रवासी वाहतूक नसून चालकांचे सक्षमीकरण, पारदर्शकता आणि सामाजिक समावेशन यांवर आधारित आहे.
रात्रीच्या शिफ्ट, विमानतळ प्रवास किंवा आपत्कालीन परिस्थितीत अखंड सेवा देण्यावर भर. सर्ज प्राइसिंग टाळून स्थिर दर.
महानगरांसोबत निमशहरी व ग्रामीण भागांसाठी स्थानिक भाषेतील ॲप, कमी इंटरनेटमध्ये कार्यरत प्रणाली आणि ऑफलाइन बुकिंग केंद्रांची सुविधा.
पोलीस पडताळणी, वर्तन प्रशिक्षण, जीपीएस ट्रॅकिंग, पॅनिक बटण यांसारख्या सुरक्षा उपाययोजना.
निश्चित रेटकार्ड, सार्वजनिक शुल्क रचना - त्यामुळे प्रवाशांना आधीच भाड्याची स्पष्ट माहिती.
सध्याच्या प्लॅटफॉर्मवर २५–३०% कमिशन आकारले जाते. भारत टॅक्सीमध्ये कोणतेही कमिशन कपात नाही; केवळ अत्यल्प तांत्रिक शुल्क.
सायकल, ऑटो, कॅब, ई-रिक्षा अशा विविध पर्यायांची एकाच ॲपमध्ये सुविधा.
ई-व्ही आणि सीएनजी वाहनांना प्रोत्साहन, महिला चालक गटांना संधी, दिव्यांग व ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा.
५ फेब्रुवारी रोजी आठ प्रमुख सहकारी संस्थांच्या पाठिंब्याने भारत टॅक्सीची औपचारिक सुरुवात झाली. अधिकृत लाँचपूर्वी दोन महिन्यांचा पायलट प्रकल्प राबवण्यात आला होता.
सध्या सेवा: दिल्ली-एनसीआर आणि राजकोट
उद्दिष्ट: दोन वर्षांत १५ कोटी चालक सदस्य
तीन वर्षांत: सर्व महानगरपालिका असलेल्या शहरांत विस्तार
शहा यांनी नमूद केले की नफा-वाटप प्रणाली पूर्णपणे स्थिर होण्यासाठी सुमारे तीन वर्षे लागू शकतात आणि सुरुवातीच्या काळात चालकांनी संयम बाळगावा.
सध्या बाजारात Ola Cabs, Uber आणि Rapido यांसारख्या कंपन्या वर्चस्वात आहेत. मात्र वाढते कमिशन, सर्ज प्राइसिंग आणि राईड कॅन्सलेशनच्या तक्रारींमुळे चालक आणि प्रवासी दोघांमध्ये नाराजी आहे.
भारत टॅक्सी स्वतःला “चालक-मालकीचे, नफा-वाटप आधारित सहकारी मॉडेल” म्हणून सादर करत आहे. जर हे मॉडेल यशस्वी झाले, तर मोबिलिटी क्षेत्रात ‘सहकार ते समृद्धी’चा नवा अध्याय लिहिला जाऊ शकतो.
भारत टॅक्सी हे केवळ एक ॲप-आधारित राईड सेवा नसून, चालकांना आर्थिक सक्षमीकरण देणारे आणि वाहतूक क्षेत्रात सहकार तत्त्वांचा विस्तार करणारे मॉडेल म्हणून मांडले जात आहे.
‘५०० रुपये द्या, सह-मालक व्हा’ या संकल्पनेतून छोट्या गुंतवणुकीतून मोठा बदल घडवण्याचा प्रयत्न आहे. अमूलप्रमाणेच, लाखो छोट्या सदस्यांच्या सहभागातून उभे राहणारे हे मॉडेल भारतातील मोबिलिटी क्षेत्रात नवा अध्याय लिहू शकेल का, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.