राजस्थानस्थित उदयपूर महिला समृद्धी अर्बन को-ऑप. बँक लि., उदयपूरची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सुखाडिया रंगमंच, टाउन हॉल येथे उत्साहात पार पडली. यावेळी ९६० हून अधिक महिला सदस्य उपस्थित होत्या. सभेचे प्रमुख वक्ते म्हणून आसामचे राज्यपाल महामहीम श्री. गुलाबचंदजी कटारिया, प्रमुख पाहुणे म्हणून उदयपूर शहराचे आमदार श्री. ताराचंदजी जैन आणि उदयपूर ग्रामीणचे आमदार श्री. फूलसिंहजी मीणा उपस्थित होते. तसेच श्री.आशुतोषजी भट्ट (प्रादेशिक लेखापरीक्षक, सहकारी संस्था, उदयपूर), श्री. लोकेशजी जोशी (उपनोंदणी अधिकारी, सहकारी संस्था, उदयपूर) हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सभेचे अध्यक्षस्थान बँकेच्या अध्यक्षा डॉ. किरण जैन यांनी भूषवले.
दीपप्रज्वलन आणि मंगलाचरणाने सुरु झालेल्या समारंभात पाहुण्यांचे तसेच सर्व सदस्यांचे स्वागत बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती विमला मुंदडा यांनी केले. आणि बँकेच्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सर्व महिला सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
बँकेच्या अध्यक्षा डॉ. किरण जैन यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रारंभाची घोषणा करत बँकेचा अहवाल सादर केला. त्यांनी बँकेची यशोगाथा, विशेषत: आगामी योजना आणि सामाजिक जबाबदाऱ्या यांची माहिती देताना डॉ. जैन म्हणाल्या की, "सध्या बँकेच्या ठेवी १४१ कोटी रुपये आणि कर्ज वितरण ६२.०७ कोटी रुपये इतके झाले आहे. यावर्षी बँकेने सर्व क्षेत्रात प्रगती साधत एकूण व्यवसाय २०३ कोटी रुपयांपर्यंत नेला आहे. महिला समृद्धी बँकेने यंदाही राष्ट्रीय स्तरावर तीन पुरस्कार मिळवून केवळ बँकेचेच नव्हे तर उदयपूर शहराचेही नाव उज्वल केले आहे. यासाठी बँक व्यवस्थापनाबरोबरच बँकेच्या सर्व महिला सदस्याही अभिनंदनास पात्र आहेत."
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनोद चपलोत यांनी बँकेमार्फत त्यांच्या ग्राहकांना सर्व डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे यावेळी सांगितले.