मलकापूर: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था जखिणवाडी यांनी सामाजिक बांधिलकी जपत तेथील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा भागात मुसळधार पावसाने थैमान घातले असून पिकांचे व जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांची पडझड होऊन नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर मळाई ग्रुप व पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेऊन श्रीमती अपर्णा यादव (उपनिबंधक सहकारी संस्था, कराड) यांच्याकडे रु.५१,१११/- चा धनादेश पतसंस्थेचे चेअरमन अजित थोरात यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक भीमाशंकर माऊर, सचिव सर्जेराव शिंदे, शाखाप्रमुख सौ. शर्मिला श्रीखंडे, सौ. सुजाता शिंदे, राजेंद्र येडगे, विकास लावंड तसेच मळाईदेवी शिक्षण संस्थेचे राजेंद्र पांढरपट्टे उपस्थित होते.
याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित भागात जाऊन अन्नधान्य, नवीन कपडे, ब्लॅंकेट, चादरी आदी जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचे नियोजनही संस्थेने केले आहे. या उपक्रमांमुळे पतसंस्थेने आपल्या सामाजिक जबाबदारीचे उदाहरण घालून दिले आहे.