मुंबईतील शिकलगार समाजातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी सन १९७७ मध्ये श्री. अब्दुल अजीज अब्दुल करीम शिकलगार यांनी सभासदसंख्या केवळ १२५ असताना, ११ ऑगस्ट १९७७ रोजी ‘शिकलगार सहकारी पतपेढी मर्यादित’ [नोंदणी क्र.: BOM RSR | 841 | 1977] ची स्थापना केली. दो टंकी येथे मोठ्या उत्साहात कामकाज सुरु करण्यात आले.
सन १९९८ मध्ये स्व. हाजी मौलाभाई हसन शिकलगार (कुर्ला व कचरेवाडी) यांनी पतपेढीची सूत्रे हाती घेतली. ते एक नि:स्वार्थी आणि समाजविकासासाठी तत्पर व्यक्ती होते. त्यांनी सुरुवातीला स्वतःच्या जागेत पतपेढीचे कामचालवून दिले आणि जागेसाठी अत्यल्प भाडे घेतले. आर्थिक तोटा सहन करूनही त्यांच्या प्रयत्नांमुळे पतपेढीला कुर्ला येथे संस्थेला ओळख मिळाली. त्यांचा कार्यकाळ १९९८ ते २००३ असा होता. या कालावधीत श्री. जावेद बुरहान शिकलगार प्रभारी होते. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे पतपेढीचे काम चांगल्या प्रकारे सुरू राहिले.
सन २००३ ते २००८ या कालावधीत श्री.अमिनभाई इब्राहीम शिकलगार (दो टंकी) यांनी चेअरमन म्हणून काम पाहिले, तर स्व. मौलाभाई हसन शिकलगार हे व्हाइस चेअरमन होते. स्व. हाजी इब्राहीम जंगू शिकलगार हे खजिनदार होते.
सन २००८ मध्ये नवीन संचालक मंडळाची निवड झाली. ज्येष्ठांना वाटले की आता नवी पिढी पुढे यावी आणि सर्वांच्या संमतीने श्री. नौशाद याकूब शिकलगार (गोरेगाव) यांची चेअरमनपदी निवड झाली. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पतपेढीने कोणत्याही आर्थिक संस्थेकडून कर्ज न घेता स्वतःच्या बळावर विस्तार साधला. आज पतपेढीच्या गोवंडी व गोरेगाव येथे दोन शाखा असून, वाढीव कर्मचारी व समर्पित टीम कार्यरत आहे. अनेक व्यापाऱ्यांना व्यवसायवाढ, अनेकांना स्वप्नातील घर, विवाहसमारंभ आणि वैद्यकीय मदत करून या पतपेढीने मोलाचे योगदान दिलेले आहे.
सध्या शिकलगार सहकारी पतपेढीने नौशाद यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर येथे ‘बी-१२, कस्तुरबा नगर सहकारी गृहनिर्माण संस्था, दुसरा मजला, ठाकूर बप्पा कॉलनी, चेंबूर, मुंबई-७१’ येथे नवीन कार्यालय खरेदी करण्यात आले आहे. सध्या बांधकाम सुरू असल्याने कार्यालय तात्पुरत्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.