चिपळूण : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिपळूणच्या २३ व्या 'पाग' (चिपळूण) शाखेचा शुभारंभ नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. प्रभाकरजी आरेकर यांच्या शुभहस्ते आणि विविध क्षेत्रांतील प्रमुख मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
संस्थेच्या यशाचा आलेख उंचावत असतानाच, चालू रौप्य महोत्सवी वर्षात २५ शाखांचा टप्पा पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
उद्घाटन प्रसंगी बोलताना संस्थापक अध्यक्ष प्रभाकरजी आरेकर यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले:
"संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू असून यावर्षी २५ शाखा कार्यान्वित करण्याचा संस्थेचा मानस आहे. पतसंस्थेच्या या वाटचालीत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आजी-माजी अधिकारी व कर्मचारी, तसेच संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. कोणत्याही संस्थेचे खरे मूल्यमापन तिचे सभासद व ग्राहक करतात; त्यांनी दिलेली पोचपावती ही कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठी असते."
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सभासद श्री. प्रकाश आंबुर्ले, श्री. सोपान पाटील, सौ. वैष्णवी मुननकर व श्री. नंदकुमार तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेची शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि ग्राहकांना मिळणाऱ्या तत्पर सेवेबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी संस्थापक अध्यक्ष, संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाचे विशेष आभार मानले.
या सोहळ्यास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावून नवीन शाखेला शुभेच्छा दिल्या:
मा. आमदार भास्कररावजी जाधव (गुहागर विधानसभा)
मा. अनिरुद्धजी निकम (कार्याध्यक्ष, सह्याद्री शिक्षण संस्था)
मा. प्रशांतजी यादव (वशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स)
मा. सूर्यकांतजी खेतले (सभापती, चिपळूण पंचायत समिती)
मा. मोहनरावजी मिरगल (अध्यक्ष, चिपळूण अर्बन बँक) व त्यांचे सहकारी
श्री. दत्तारामजी सुर्वे (मराठा नागरी सहकारी पतसंस्था)
श्री. मिथिलेश नरळकर (नगरसेवक, चिपळूण नगर परिषद)
श्री. ठसाळे (उपमुख्याधिकारी)
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आजी-माजी अधिकारी आणि पाग परिसरातील प्रतिष्ठित नागरिक.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. हेमचंद्र हळदणकर, संचालक सर्वश्री दिलीप मयेकर, सुहास भोसले, पराग आरेकर, अरुण पाटील, उदय वेल्हाळ, विजय जाधव, तसेच संचालिका सौ. स्मिता आरेकर, श्रीमती प्रज्ञा नरवणकर, सौ. रागिणी आरेकर यांच्यासह संस्थेचा सर्व कर्मचारी वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार व्यवस्थापक श्री. संदीप रहाटे यांनी मानले.