श्री समर्थ भंडारी पतसंस्थेच्या लांजा शाखेचे लोकार्पण 
Co-op Credit Societies

श्री समर्थ भंडारी पतसंस्थेची लांजात नवी भरारी; २२ व्या शाखेचे थाटात उद्घाटन!

चिपळूण ते लांजा... सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीला बळ देणारा प्रामाणिक सहकाराचा प्रवास

Prachi Tadakhe

महाराष्ट्रातील अर्थकारणाचा आणि ग्रामीण विकासाचा पाठीचा कणा म्हणून सहकार क्षेत्राकडे पाहिले जाते. आज अनेक संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना, दुसरीकडे 'पारदर्शकता, सुरक्षितता आणि व्यावसायिकता' यांच्या जोरावर सभासदांचा विश्वास संपादन करत प्रगतीची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या संस्थाही तितक्याच सक्षमपणे उभ्या आहेत. 'श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण' ही अशीच एक अग्रगण्य संस्था. संस्थेच्या २२ व्या 'लांजा' शाखेचा नुकताच झालेला भव्य शुभारंभ हा केवळ एका नव्या शाखेचा विस्तार नसून, प्रामाणिक सहकाराच्या यशस्वी वाटचालीची पावती आहे.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून निवृत्त झाल्यानंतर, सहकार क्षेत्रातील आपल्या दीर्घ अनुभवाचा उपयोग सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व्हावा, या उदात्त हेतूने संस्थापक अध्यक्ष मा. श्री. प्रभाकरजी आरेकर यांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. "जर काम प्रामाणिकपणे केले, तर सहकार हे प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण प्रगतीचे सर्वात प्रभावी माध्यम ठरू शकते," हा श्री. आरेकर यांचा विश्वास आज संस्थेच्या प्रत्येक टप्प्यावर सार्थ ठरताना दिसत आहे.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष मा. श्री. सुरेशजी साळुंखे आणि इतर प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते लांजा शाखेचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्षांनी ठेवीदार आणि सभासदांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला - "गुंतवणूकदारांनी डोळसपणे आणि योग्य संस्थेची निवड करून गुंतवणूक केल्यास त्यांचे आर्थिक नुकसान कधीही होणार नाही." संस्थेने अल्पावधीत मिळवलेला नावलौकिक हा कडक शिस्त आणि सभासदांच्या विश्वासावर आधारलेला आहे.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मा.डाॅ.तानाजीराव चोरगे सर यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करताना संस्थापक, अध्यक्ष मा.प्रभाकर आरेकर साहेब

या सोहळ्यात सहकार क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करताना, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे सर यांच्या नेतृत्वाखाली बँकेने साधलेल्या ऐतिहासिक प्रगतीचाही विशेष गौरव करण्यात आला. राज्यात दुसऱ्या क्रमांकाची बँक म्हणून नावारूपाला आलेली ही बँक आणि तिने जाहीर केलेला ३०% लाभांश (Dividend) हा संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल समर्थ भंडारी नागरी पतसंस्था चिपळूण चे संस्थापक अध्यक्ष श्री आरेकर यांनी डॉ. तानाजीराव चोरगे सर यांचा संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये सत्कारही केला, जो सहकारातील आदराचे प्रतीक आहे.

लांजा शाखेच्या शुभारंभास लाभलेली विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती ही संस्थेच्या व्यापक सामाजिक संबंधांची साक्ष देते. लांजा तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष श्री. सुभाषजी लाखण, संचालक श्री. सुभाषजी पवार, माजी नगराध्यक्षा सौ. संपदा वाघधरे आणि निवृत्त बँक अधिकारी श्री. विनायक नार्वेकर यांसारख्या दिग्गजांनी संस्थेला केवळ शुभेच्छाच दिल्या नाहीत, तर सर्वतोपरी सहकार्याची ग्वाहीही दिली.

त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे संचालक मा. महेशजी खामकर, चिपळूण नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. मिथिलेशजी नरळकर, लांजा नगरपंचायतीचे नगरसेवक श्री. पंढरीनाथ माईशेट्ये, राजापूर अर्बन बँकेचे अधिकारी श्री. बिर्जे, चिपळूण अर्बन बँकेचे श्री. शेट्ये आणि लांजा शाखाधिकारी सौ. अंकिता जायदे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कोणत्याही संस्थेचे यश हे तिच्या धोरणांसोबतच तिच्या प्रत्यक्ष व्यवस्थापनावर अवलंबून असते. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष श्री. हेमचंद्र हळदणकर, संचालक मंडळ (श्री. दिलीप मयेकर, श्री. पराग आरेकर, श्री. उदय वेल्हाळ, सौ. स्मिता आरेकर, श्रीम. प्रज्ञा नरवणकर), सामाजिक कार्यकर्ते श्री. राजूशेठ राणे, श्री. योगेशजी वाघधरे, विविध बँकांचे माजी अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती. संस्थेचे व्यवस्थापक श्री. संदीप रहाटे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शनाची जबाबदारी अतिशय उत्तमरीत्या पार पाडली.

लांज्यातील या नव्या शाखेमुळे स्थानिक व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित आणि गतिमान बँकिंग सेवा तर मिळतीलच, पण त्यासोबतच कोकणातील सहकार चळवळीला एक नवी दिशा आणि बळ मिळेल, यात शंका नाही. 'श्री समर्थ भंडारी' पतसंस्थेची ही गरुडझेप सहकार क्षेत्रासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे!

SCROLL FOR NEXT