कुंडल येथील किसान नागरी सहकारी पतसंस्थेच्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित बोलताना चेअरमन अनिल लाड. व्यासपीठावर इतर मान्यवर. 
Co-op Credit Societies

सभासदांचे हित हेच किसान पतसंस्थेचे ध्येय: कुंडलमध्ये २९ वी वार्षिक सभा संपन्न

चेअरमन अनिल लाड यांची घोषणा: सभासदांना १३ टक्के लाभांश कायम; २०२७ पर्यंत उभारणार स्वमालकीची भव्य इमारत.

Prachi Tadakhe

कुंडल : किसान नागरी सहकारी पतसंस्थेने आपल्या स्थापनेपासूनच नेहमी सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सर्वसामान्य कर्जदार व ठेवीदारांचा विश्वास हीच संस्थेच्या यशस्वी वाटचालीची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन पतसंस्थेचे चेअरमन अनिल लाड यांनी केले. कुंडल येथे आयोजित संस्थेच्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना चेअरमन अनिल लाड यांनी पुढील महत्त्वाचे मुद्दे मांडले:

  • ठेवींचे उद्दिष्ट: सध्या संस्थेकडे सुमारे ५४ कोटी रुपयांच्या ठेवी असून, येत्या आर्थिक वर्षात हा टप्पा ८५ कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.

  • १३ टक्के लाभांश: संस्थेने स्थापनेपासून सभासदांना सातत्याने १३ टक्के लाभांश दिला असून, ही परंपरा भविष्यातही कायम राखली जाईल.

  • स्वमालकीची इमारत: आर्थिक नियोजनाचा विस्तार करत २०२७ पर्यंत संस्थेची भव्य स्वमालकीची इमारत उभारली जाईल.

  • नवीन शाखा विस्तार: संस्थेच्या आळसंद, देवराष्ट्रे, वांगी आणि भवानीनगर या चार नवीन शाखांना मंजुरी मिळाली असून त्या लवकरच ग्राहकांच्या सेवेत रुजू होतील.

  • शेतकऱ्यांसाठी उपक्रम: शेतकरी सभासदांसाठी 'खासबाई फार्मर प्रोड्युसर कंपनी'ची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून केळीसह विविध पिकांच्या लागवडीपासून ते थेट विक्रीपर्यंतची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे.

याप्रसंगी जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "गावातील सर्वसामान्य कर्जदार प्रामाणिकपणे वेळेत कर्जाची परतफेड करतात. वाढत्या स्पर्धेच्या काळातही किसान पतसंस्थेने आपली विश्वासार्हता आणि नावीन्य जपले आहे."

या वार्षिक सर्वसाधारण सभेस माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक एडके, माजी सरपंच प्रमिलाताई पुजारी, सामाजिक कार्यकर्त्या सुमन गायकवाड, व्हाईस चेअरमन सारंग माने यांच्यासह सर्व संचालक, पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र जाधव यांनी केले, स्वागत व प्रास्ताविक महारूद्र जंगम यांनी मांडले. वार्षिक अहवालाचे वाचन संतोष बाबर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मोहन पुजारी यांनी मानले.

SCROLL FOR NEXT