तळमावले (सातारा) : ग्रामीण भागातील आर्थिक क्रांतीचे केंद्र आणि सर्वसामान्य, तरुण व महिलांच्या प्रगतीचा आधारवड ठरलेल्या जन सहकार पतसंस्थेच्या वतीने नुकतेच वाहन वितरण करण्यात आले. संस्थेच्या प्रामाणिक सभासद सौ. रुपाली गणेश पवार यांना काळगाव जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनिता चाळके यांच्या हस्ते वाहनाची किल्ली सुपूर्द करण्यात आली. या सोहळ्याला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुतीराव मोळावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आजच्या स्पर्धात्मक आणि डिजिटल युगात जन सहकार पतसंस्थेने आपल्या ग्राहकांसाठी सर्व व्यवहार 'डिजिटल आणि स्मार्ट' केले आहेत. यामुळे संस्थेच्या कामकाजात कमालीची पारदर्शकता आली असून, ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. केवळ नफा कमावणे हा उद्देश न ठेवता, 'लोकाभिमुख बँकिंग' ही संकल्पना संस्थेने प्रत्यक्ष व्यवहारात आणली आहे. तळमावले येथून सुरू झालेला हा यशस्वी प्रवास आता कराड, आगाशिवनगर आणि थेट मुंबईतील कोपरखैरणे अशा विविध भागांत विस्तारला आहे.
"सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करणे हेच आमच्या यशाचे गमक आहे. बेरोजगार तरुणांना केवळ कर्ज न देता, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अर्थसहाय्य करणे हे आमचे कर्तव्य आहे." - मारुतीराव मोळावडे (संस्थापक-चेअरमन, जन सहकार पतसंस्था)
जन सहकार पतसंस्थेने आजवर परिसरातील कित्येक बेरोजगार युवकांना आणि गृहिणींना सढळ हाताने कर्जपुरवठा करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले आहे. अनेक कुटुंबांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी संस्थेने दिलेले आर्थिक पाठबळ मोलाचे ठरले आहे. सौ. रुपाली पवार यांना झालेले वाहन वितरण हे याच महिला सक्षमीकरणाच्या धोरणाचा एक भाग मानला जात आहे.
संस्थेच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि ग्राहकांच्या आग्रहामुळे लवकरच मुंबईतील घणसोली येथे संस्थेची नवीन डिजिटल शाखा सुरू करण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती चेअरमन मारुतीराव मोळावडे यांनी याप्रसंगी दिली. या विस्तारामुळे मुंबईतील नोकरदारांना आणि स्थानिक व्यावसायिकांना संस्थेच्या दर्जेदार सेवांचा लाभ घेता येणार आहे.
या कार्यक्रमाला जन सहकार पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ, सल्लागार, स्थानिक व्यापारी, हितचिंतक आणि संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला असून, परिसरातून संस्थेच्या या लोकाभिमुख कार्याचे कौतुक होत आहे.