कोपार्डे: कुडित्रे-कोपार्डे (ता. करवीर) येथील श्री यशवंत सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये अत्यंत समाधानकारक कामगिरी नोंदवली आहे. बँकेने या वर्षात ३ कोटी ९७ लाख रुपये ढोबळ नफा मिळवला असून, सर्व वैधानिक तरतुदी पूर्ण केल्यानंतर बँकेला १ कोटी ८२ लाख रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष महेश पाटील (शिंगणापूरकर) यांनी दिली.
बँकेने सरत्या आर्थिक वर्षात ठेवी, कर्ज आणि एकूण व्यवसायात लक्षणीय वाढ केली आहे. या प्रगतीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
एकूण व्यवसाय: बँकेच्या एकूण व्यवसायात ४५ कोटी ४४ लाखांची वाढ होऊन तो आता ३४८ कोटी २० लाख रुपयांवर पोहोचला आहे.
ठेवींचा टप्पा: चालू आर्थिक वर्षात बँकेने २०० कोटी ठेवींचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. वर्षाअखेर बँकेच्या एकूण ठेवी २९ कोटी ४१ लाखांच्या वाढीसह २०९ कोटी ४७ लाख रुपये झाल्या आहेत.
कर्ज वाटप: कर्ज व्यवसायातही १५ कोटी ३ लाखांची वाढ झाली असून, एकूण कर्जपुरवठा १३८ कोटी ७३ लाख रुपये झाला आहे.
बँकेच्या प्रगतीचा आलेख चढता असून, व्यवस्थापनाने चालू नवीन आर्थिक वर्षासाठी ४०० कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी देत ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यामुळेच हे यश शक्य झाल्याचे अध्यक्ष महेश पाटील यांनी नमूद केले.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष दिलीप खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पाटील, तसेच संचालक प्रकाश देसाई, अमर पाटील, नंदकुमार पाटील, विश्वास पाटील, सर्जेराव शेलार, हिंदुराव तोडकर, कुंडलिक पाटील, प्रल्हाद खाडे, दत्तात्रय पाटील, मधुकर पाटील, कुलभूषण पाटील, चंद्रकांत पाटील, जयसिंग सूर्यवंशी, महेश पाटील, बाबूराव रानगे, युवराज कांबळे, शोभा करपे, मंगल पाटील, किरण कर्नाड, ज्ञानदेव पाटील आणि दत्तात्रय नाईक आदी उपस्थित होते.