कोपार्डे : सभासद, ठेवीदार आणि कर्जदारांच्या विश्वासाच्या आणि सहकार्याच्या जोरावर श्री यशवंत सहकारी बँकेने चालू आर्थिक वर्षात उत्तम प्रगती साध्य केली आहे. बँकेच्या या यशामध्ये वाटा असलेल्या सभासदांना चालू वर्षासाठी १२ टक्के लाभांश (Dividend) देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा बँकेचे चेअरमन महेश पाटील (शिंगणापूरकर) यांनी केली.
कुडित्रे - कोपार्डे (ता. करवीर) येथील शेतकरी सांस्कृतिक भवनात श्री यशवंत सहकारी बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानावरून चेअरमन पाटील बोलत होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली.
४०० कोटींच्या व्यवसायाचे ध्येय
बँकेच्या आर्थिक आलेखाची माहिती देताना चेअरमन महेश पाटील म्हणाले की, "सध्या बँकेकडे २०९ कोटी ४६ लाख रुपयांच्या ठेवी जमा असून, बँकेने १३८ कोटी ७२ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. आगामी आर्थिक वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय ४०० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे."
सभेत विषयपत्रिकेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पाटील यांनी केले, तर इतिवृत्त वाचन विकास पाटील यांनी केले. संचालक नंदकुमार पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
नोकरभरती प्रक्रिया: सभेत नोकरभरतीच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली. यावर उत्तर देताना अध्यक्षांनी स्पष्ट केले की, कोर्टाचा जो काही निर्णय येईल, त्याला बँक पूर्णपणे बांधिल राहील.
शेतकरी हितीचे ठराव: राज्य शासनाच्या प्रस्तावित 'शक्तिपीठ महामार्गा'ला विरोध दर्शवणारा ठराव सभेत एकमुखाने संमत करण्यात आला. तसेच येत्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन ६,००० रुपये दर मिळावा, अशी मागणी करणारा ठराव बाजीराव देवाळकर व नामदेव यादव यांनी मांडला, जो सर्वानुमते मंजूर करून राज्य व केंद्र सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या वार्षिक सर्वसाधारण सभेतील चर्चेत सुरेश रांगोळकर, उत्तम पाटील, भीमराव नाळे, डॉ. बी. बी. पाटील, आनंदराव पाटील, जोत्स्ना पाटील, मारुती शेलार, प्रकाश देशमुख, सदाशिव शेलार, शामराव सूर्यवंशी, के. एम. किरूळकर आणि महादेव माळी यांनी सहभाग घेतला.
या प्रसंगी बँकेचे संचालक अमर पाटील, प्रकाश देसाई, विश्वास पाटील, कूलभूषण पाटील, सर्जेराव शेलार, दत्तात्रय पाटील यांच्यासह इतर संचालक, पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.